Ahmednagar: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेक प्रकाराचा भारतीय जनसंसदच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि गायकवाड यांना संरक्षण देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रवीणदादा गायकवाड हे समाजप्रबोधन व युवकांना रोजगाराभिमुख घडवण्यासाठी कार्यरत असून, ते शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजात रुजवण्याचे कार्य करत आहेत. मात्र, अलीकडे अक्कलकोट येथे एका कार्यक्रमादरम्यान शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनास अडथळा निर्माण करत शाईफेक व धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी शिवधर्मचे अध्यक्ष दीपक काटे (जि. पुणे) यांच्यासह सात जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तरीही आरोपींवर अद्याप कठोर कारवाई न झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनसंसदचे अध्यक्ष अशोक सब्बन, सुधीर भद्रे, रवी सातपुते, राजेंद्र कर्डीले, नलिनी गायकवाड, बाळासाहेब पालवे, विक्रम क्षिरसागर, इरफान तांबोळी, शिवाजी भोसले, रईस शेख, बबलु खोसला आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींना त्वरीत अटक करून कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.