सुपरफास्ट बातमी

Ahilyanagar Public issue: मनपाचे कचरा व्यवस्थापन कोलमडले; 1 महिन्यापासून कचरा न उचलल्याने शहर दुर्गंधीमय

Ahilyanagar Public issue,कचरा

संतप्त महिलांचा प्रशासकांस घेराव

अहिल्यानगर | प्रतिनिधी

Ahilyanagar Public issue: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना घरगुती कचरा साठवून ठेवण्याची वेळ आली आहे. रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचले असून त्यामुळे दुर्गंधी, मोकाट कुत्रे, डासांचा त्रास आणि आरोग्य धोक्यात आले आहे.

महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी पाईपलाईन रोड व पद्मा नगर परिसराची पाहणी केली असता महिलांनी त्यांना थेट सवाल केला – “आयुक्त साहेब, कचरा टाकू तरी कुठे?” नागरिकांनी कचरा न उचलल्याच्या तक्रारी करत प्रशासनाची झोप उडवली.

या भागातील महिलांनी स्पष्ट केले की, मागील अनेक दिवसांपासून कचरा उचलण्यात पालिकेचे यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी, अस्वच्छता, आजारांचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्तींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
माजी नगरसेवक निखिल वारे यांनी मागील आठवड्यात कचरा संकलनाच्या मुद्द्यावर आवाज उठवून पालिकेने गेल्या तीन महिन्यांपासून कचरा संकलन कर आकारू नये, अशी मागणी केली होती. त्यांनी दररोज घराघरांतून घंटागाडीच्या माध्यमातून नियमित कचरा संकलन करण्याची मागणी केली होती.

“शहरातील कचरा संकलन व्यवस्थेतील अडचणींची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. सध्या कार्यरत असलेल्या एजन्सीच्या कार्यक्षमतेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे की, सद्य:स्थित एजन्सी हटवून नवीन एजन्सीकडे जबाबदारी सोपवली जाईल.

नवीन एजन्सीसोबत कामकाजाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, लवकरच शहरात नियमित, वेळेवर आणि यंत्रबद्ध कचरा संकलन सुरू केले जाईल. नागरिकांना स्वच्छतेचा त्रास होऊ नये हे आमचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. यामध्ये कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही,” असे आश्वासन आयुक्त डांगे यांनी दिले.

हे हि वाचा : Ahmednagar | अहिल्यानगर पोलिसांचा अभिनव उपक्रम; क्यूआर कोडद्वारे नागरिकांचा अभिप्राय घेण्यास सुरुवात; एसपी सोमनाथ घार्गे यांचे आवाहन

Exit mobile version