नेवासा | प्रतिनिधी
The burning car: संभाजीनगरहून अहिल्यानगरकडे जात असलेल्या एका कारने वडाळाबहिरोबा बसस्थानकापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अचानक पेट घेतला. काल शनिवार, ता. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पाऊण तासात संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने, कारमध्ये धूर होताच चालक आशिष सूर्यवंशी (रा. अहिल्यानगर) यांनी प्रसंगावधान राखत उडी मारल्याने ते बालंबाल बचावले आहेत.
वडाळाबहिरोबा येथील मोटे वस्तीच्या समोर महामार्गावर ही थरारक घटना घडली. कारने पेट घेताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक ग्रामस्थ, तसेच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार ज्ञानेश्वर माळवे आणि सामाजिक कार्यकर्ते जयवंत मोटे तात्काळ घटनास्थळी जमा झाले.
कारला आग लागल्याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र, नगर-संभाजीनगर महामार्गावरील खड्डे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचू शकले नाही. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. याच खोळंब्याचा फटका या घटनेत बसला.
आग लागल्याची माहिती देऊनही तब्बल पाऊण तास उलटून गेला, तरी अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचू शकले नाही. या पाऊण तासाच्या कालावधीत, आग आटोक्यात आणण्याची कोणतीही सुविधा उपस्थितांकडे नव्हती. त्यामुळे त्यांना संपूर्ण वाहन जळताना निमूटपणे पाहावे लागले. अग्निशमन दलाच्या वेळेवर न पोहोचण्यामागे रस्त्याची झालेली दुरवस्था हेच प्रमुख कारण ठरले. एका बाजूला जीवन वाचले असले तरी, दुसऱ्या बाजूला वेळेवर मदत न मिळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीच्या समस्येवर पुन्हा एकदा गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


