अहिल्यानगर | प्रतिनिधी
Sathi Portal Protest: राज्य शासनाच्या “साथी पोर्टल फेज-२” या नव्या प्रणालीविरोधात राज्यभरातील कृषी सेवा केंद्र धारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स, सीड्स डिलर्स असोसिएशन (MAFDA) यांच्या आवाहनानुसार मंगळवार, ता. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या आंदोलनाला अहिल्यानगर जिल्हा खते, बियाणे व कीटकनाशके डिलर्स असोसिएशन यांनीही पाठिंबा दर्शविला असून, जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र या दिवशी पूर्णपणे बंद राहणार आहेत. या निर्णयाची माहिती असोसिएशनचे सचिव संग्राम-दिलीप पवार व अध्यक्ष छबुराव किसनराव हराळ यांनी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.
असोसिएशनने निवेदनात नमूद केले आहे की, “साथी पोर्टल फेज-२” प्रणालीमुळे विक्रेत्यांना क्लिष्ट प्रक्रिया, तांत्रिक अडचणी आणि व्यवहारात अनावश्यक विलंब सहन करावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खते, बियाणे, कीटकनाशके यांसारख्या अत्यावश्यक वस्तू वेळेवर मिळण्यात अडथळे येत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हंगामी शेती नियोजनावर थेट परिणाम होत असून, कृषी उत्पादनावरही त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. असोसिएशनचे मत आहे की, “शेतकरी वेळेवर पीक नियोजन करतात; मात्र प्रणालीतील विलंबामुळे खते-बियाण्यांचा पुरवठा उशिरा होत आहे, हे अन्यायकारक आहे.”
असोसिएशनने शासनाला आवाहन केले आहे की, या समस्येचा गांभीर्याने विचार करून प्रणालीतील त्रुटी दुरुस्त कराव्यात. “हा बंद शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रणालीतील कार्यक्षमतेसाठी एक प्रतीकात्मक आंदोलन आहे. शासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा विचार करावा लागेल,” असा इशारा सचिव पवार व अध्यक्ष हराळ यांनी दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कृषी सेवा केंद्र धारक व्यापाऱ्यांनी या बंदला एकमुखी पाठींबा दिला असून, स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांनाही या विषयाची जाणीव करून देण्यात येत आहे.
असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, साथी पोर्टलचे उद्दिष्ट पारदर्शक व्यवहार असले तरी सध्याच्या प्रणालीतील तांत्रिक गुंतागुंत, नेटवर्क समस्या आणि क्लिष्ट प्रक्रिया यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने कृषी सेवा केंद्र धारक व शेतकरी या दोन्ही घटकांचा विचार करून सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रणाली विकसित करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले असून, त्याची प्रत राज्य शासनालाही पाठविण्यात आली आहे. प्रशासनाने शेतकरी व व्यापारी यांच्या हितासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
“साथी पोर्टल फेज-२ ही प्रणाली पारदर्शकतेसाठी आणली असली, तरी तिच्या तांत्रिक गुंतागुंतीमुळे व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकरी वर्गालाही याचा फटका बसत आहे. शासनाने त्वरीत सुधारणा कराव्यात, हीच आमची मागणी आहे.”
– छबुराव हराळ, अध्यक्ष, अहमदनगर फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स, सीड्स डिलर्स असोसिएशन
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


