अहिल्यानगर | प्रतिनिधी
Dr Babasaheb Ambedkar statue: अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लवकरच सुसज्ज संविधान भवन उभारले जाणार असून, यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी व शासनाच्या माध्यमातून १० कोटी रुपये, अशा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी केली.
मार्केट यार्ड चौक येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मनपा आयुक्त डॉ. यशवंत डांगे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अॅड. गोरक्ष लोखंडे, भन्ते राहुल बोधी, पुतळा समितीचे अध्यक्ष सुमेध गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी देशाला एकता, समता आणि बंधुतेची शिकवण दिली. त्यांच्या नावाने संविधान भवन उभारणे म्हणजे त्यांच्या विचारांना खरे अभिवादन आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनीच देशाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत, तोपर्यंत संविधान अबाधित राहील.”
यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभागासाठी यंदा २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही सांगितले. तसेच इंदू मिल येथील भव्य स्मारक लवकर पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांनी वंचित समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. १९२८ मध्ये बाबासाहेबांनी अहिल्यानगरला भेट दिली होती. येथे ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हे पुस्तक लिहिण्यात आले. बाबासाहेबांचे नगर जिल्ह्याशी विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे.”
आमदार संग्राम जगताप म्हणाले, “मार्केट यार्ड येथे पुतळा उभारण्यासाठी मोठा संघर्ष झाला. संविधान भवनाची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे ठेवली आहे. संविधान ही आपल्या लोकशाहीची आधारशिला आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनंद शिंदे यांच्या पथकाने आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविकात आयुक्त डॉ. यशवंत डांगे यांनी मनपाच्या विकासकामांचे सादरीकरण केले.
पुतळ्याची वैशिष्ट्ये:
- प्रेरणा: सेंट्रल व्हिस्टा, नवी दिल्ली येथील नव्या संसद भवनावर आधारित रचना
- पुतळा: १० फूट उंच कास्यधातूचा पूर्णाकृती पुतळा
- चौथारा: १५ फूट उंच
- वजन: ९५० किलो
- खास वैशिष्ट्य: मागील भिंतीवर एलईडीमध्ये बाबासाहेबांची स्वाक्षरी, समोर लेखणीचे शिल्प
- खर्च: पुतळा – ₹१६.७९ लाख, सुशोभीकरण – ₹६६ लाख
- धृश्य साजशृंगार: सर्वोच्च न्यायालयातील पुतळ्याच्या धर्तीवर