
अहमदनगर | प्रतिनिधी
Ahilyanagar public issue: शहरातील अनेक नागरिकांना गेल्या काही दिवसांत वीजबिले दहापटीने वाढून येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि चुकीची बिलिंग प्रणाली याविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, महावितरण कार्यालयात निवेदन देत योग्य बिलिंग व अखंडित २४ तास वीजपुरवठा ची मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आपल्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल बोंदर्डे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला अध्यक्षा ॲड. विद्या शिंदे, महासचिव दिलीप घुले, युवा उपाध्यक्ष विजय लोंढे आदी उपस्थित होते.
नुकतेच शहरातील देवेंद्र सहाणे यांना दहापटीने वाढीव बिल आले असून, अनेक नागरिकांना अशाच स्वरूपचे बिल आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारी केल्यानंतरही त्याकडे महावितरण कडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना बिल दुरुस्तीसाठी कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत, अशी तक्रारही करण्यात आली.
भरत खाकाळ म्हणाले की,
“नागरिकांना योग्य व न्याय्य बिल मिळावे, यासाठी तत्काळ तपासणी करून ठोस उपाययोजना कराव्यात. महावितरणकडून नगरकरांची सरळसरळ पिळवणूक होत आहे. वाढीव बिलांचा प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास, आम्ही संपूर्ण शहरातील नागरिकांना घेऊन विद्युत भवन येथे मोठे आंदोलन करू.”
महिला अध्यक्षा ॲड. विद्या शिंदे यांनी सांगितले की,
“नगर शहरात दररोज दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात नागरिकांना त्रास नको, यासाठी वीज वितरणाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. जर सणासुदीच्या काळात वीज गेली, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
वारंवार वीज जाणे आणि वाढीव बिल या दुहेरी समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, दिवाळीपूर्वी महावितरणने पारदर्शक बिलिंग प्रणाली व अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा

