नगर तालुका | प्रतिनिधी
Ahilyanagar literature: “पुस्तक वाचनाने बुद्धी तल्लख होते. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे वाचक ग्रंथवाचनापासून दूर जात आहे, ही खंत वाटते,” असे प्रतिपादन साहित्यिक रामदास कोतकर यांनी केले.
श्रद्धा सार्वजनिक वाचनालय, पिंपळगाव वाघा यांच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन व वाचक संवाद कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीने विविध पुरावे सादर केले आहेत. त्यातील बहुसंख्य प्राचीन ग्रंथ, शिलालेख हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचा आपल्याला अभिमान आहे. सार्वजनिक ग्रंथालयामार्फत हस्तलिखित ग्रंथांचे जतनकार्य सुरू असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.”
यावेळी कोतकर यांनी स्वतःची ‘यात्रा आमच्या गावाची’ ही कविता सादर केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका यु. बी. सोनवणे म्हणाल्या, “वाचाल तर वाचाल या उक्तीचे पालन सर्वांनी केले पाहिजे. मराठी भाषेला देवनागरी लिपी असल्याने विपुल साहित्य उपलब्ध झाले आहे. इतर अनेक भाषांना लिपी नसल्याने त्यांचे साहित्य मर्यादित आहे.”
प्रास्ताविक व स्वागत वाचनालयाचे सचिव वसंत कर्डिले यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रंथपाल यमुना कांडेकर–कर्डिले यांनी केले.
या कार्यक्रमास प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती निघुट, आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदिनाथ वाबळे, तेजस कर्डिले, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, वाचक सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


