अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar literature: महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत साहित्य आणि संस्कृती मंडळांच्या समन्वयाने अहिल्यानगर शहरात ता. ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सेनापती बापट साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी आणि लेखक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आल्याची माहिती संयोजक सचिन मोहन चोभे यांनी दिली.
संमेलनाचे आयोजन सुखकर्ता लॉन व मंगल कार्यालय, नेप्ती बायपास चौकाजवळ, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे. यंदाच्या संमेलनास स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट यांचे नाव देण्यात आले असून, त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचा हेतू असल्याचे चोभे यांनी सांगितले.
सध्याच्या ओला दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या समस्यांवर साहित्याच्या माध्यमातून चर्चा घडवण्याच्या उद्देशाने इंद्रजीत भालेराव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आत्मनिर्धार फाउंडेशन, निंबळक, ता. नगर या संस्थेला यंदाच्या जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. अहिल्यानगरसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर अशा शेजारील जिल्ह्यांतील साहित्यिक, कवी आणि साहित्यरसिक या संमेलनात सहभागी होणार आहेत.
या दोन दिवसीय संमेलनात व्याख्यान, परिसंवाद, लोककलांचे सादरीकरण आणि काव्यसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सर्व सत्रांचे नियोजन साहित्य आणि संस्कृती मंडळाचे निरीक्षक बी. जी. शेखर व डॉ. राजेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा झाली होती. मात्र ग्रामीण भागातील साहित्यिकांच्या भाषेला आणि भावनांना न्याय देण्यासाठी शेती-मातीशी नाळ असलेल्या कवी-लेखक इंद्रजीत भालेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष हभप सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी सांगितले.

आयोजक संस्था आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी सांगितले की, संपूर्ण जिल्ह्यातील साहित्यिकांनी संमेलनाला सहकार्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शैक्षणिक संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्याशीही समन्वय साधला जात आहे. महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचाही सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. विशेषतः महिला साहित्यिकांना अधिक संधी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
संयोजन समितीचे समन्वयक लेखक रामदास कोतकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व साहित्यिक संघटनांशी संपर्क साधला जात आहे. नवसाहित्यिक आणि ज्येष्ठ साहित्यिकांचा संगम घडवून हे संमेलन अधिक अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रत्येक सत्र साहित्यरसिकांसाठी महत्त्वपूर्ण व विचारप्रवर्तक असेल. काटेकोर नियोजनासोबत जास्तीत जास्त रसिकांना सहभागी करून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आले आहेत. इच्छुक नागरिकांनी आर्थिक, सामाजिक किंवा स्वयंसेवी स्वरूपात संमेलनाला सहकार्य करावे, असे आवाहनही कोतकर यांनी केले.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


