अहमदनगर | प्रतिनिधी
Ahilyanagar dustbin morcha: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नियोजनशून्य व उदासीन कारभारामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः प्रभाग क्रमांक 1 व 7 मध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, सर्वत्र कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. घंटागाडी वेळेवर न आल्यामुळे नागरिकांना घरातच डस्टबिन भरून कचरा साठवावा लागत आहे, परिणामी दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह डस्टबिन मोर्चा काढून महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
डॉ. बोरुडे म्हणाले, “महापालिकेचे स्वच्छतेविषयी फक्त जाहिरातबाजी चालू असून, प्रत्यक्षात रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नागरिक आपले कर प्रामाणिकपणे भरतात, मात्र त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. येत्या 8 दिवसांत कचरा व लाईट प्रश्न मार्गी लागला नाही, तर महापालिका आयुक्तांच्या दालनातच कचरा टाकून आंदोलन छेडण्यात येईल.”
या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा आशाताई निंबाळकर, तसेच हेमलता कांबळे, वैशाली राजहंस, रोहिणी अंकुश, सुरेखा फुलपगार, सुनंदा शिरवाळे, पुष्पा राऊत, सुरज पाचारणे, आदित्य काकडे, रितेश रोकडे, अक्षय वाणी, युवराज भापकर, राहुल कातोरे, विनोद जोंधळे, शुभम ताठे, अमोल गव्हाणे, प्रवीण बडे, रोहित बारवकर, आदित्य अडसुरे, गौरव मोरे, अनिता भोसले, अशा गायकवाड, सुनंदा सरोदे, प्रिया गायकवाड आदींसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
आशाताई निंबाळकर यांनीही प्रशासनावर ताशेरे ओढत सांगितले की, “प्रशासनाची बेपर्वाई इतकी वाढली आहे की नागरिकांच्या घरी चार-पाच डस्टबिन कचऱ्याने भरले जात आहेत. त्यामुळे रोगराई आणि दुर्गंधी पसरत असून लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल.”