अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar cultural politics: अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) मनपाचे प्रथम विरोधी पक्षनेते आणि ‘दै. रयत समाचार’चे संपादक भैरवनाथ वाकळे यांची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली असून ती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आहे. ता. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी फेसबूक या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये धार्मिक द्वेष आणि समाजात फूट पाडणाऱ्या राजकारणाला विरोध करत, त्यांनी ‘छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश होऊ देणार नाही’ अशी परखड भूमिका घेतली आहे.
’वाद पेटवणाऱ्यांना मतदान नाही‘
वाकळे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, “महाराष्ट्रात ‘हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई’ वाद पेटवणाऱ्यांना मी मतदान करणार नाही!” तसेच, “हे लक्षात घ्या! शिवरायांच्या महाराष्ट्राचा #गायपट्टा होऊ द्यायचा नाही,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या पोस्टचा थेट रोख हा शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवून राजकीय फायदा घेणाऱ्या प्रवृत्तींवर आहे. विशेषतः, त्यांनी “छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश होऊ देणार नाही!” या वाक्यातून महाराष्ट्रातील राजकारण धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने जाऊ नये, या भूमिकेवर जोर दिला आहे.
आमदारांच्या विधानावर सडेतोड उत्तर
भैरवनाथ वाकळे यांची ही पोस्ट अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या मुस्लीमविरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आली आहे. आमदारांनी ‘दिवाळीची खरेदी हिंदूकडूनच करा’ असे विधान केले होते, तसेच वेळोवेळी मुस्लीम समाजावर खालच्या पातळीवर टीका केली होती.
समाजात दुही निर्माण करणाऱ्या या वक्तव्यांना विरोध करण्यासाठी वाकळे यांनी ‘हिंदू-मुस्लीम द्वेष न बाळगता शांतता पाहिजे आहे’, ही स्पष्ट भूमिका घेतली आणि धार्मिक सलोख्याचा संदेश देणारी ही पोस्ट व्हायरल झाली.
पोस्टला देशभरातून प्रतिसाद
भैरवनाथ वाकळे यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले आहे. त्यांची हि पोस्ट आतापर्यंत २ लाख ९० हजार लोकांनी पहिली असून; १२,८०० हून अधिक लाईक्स (रिअॅक्शन्स) मिळाले आहेत, तर ३९५ वेळा ती शेअर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावर ८०० हून अधिक कमेंट्स आल्या असून, त्यामध्ये केवळ महाराष्ट्रातूनच नाही, तर देशभरातून लोकांनी वाकळे यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. सामाजिक शांतता आणि शिवकालीन धर्मनिरपेक्ष मूल्यांचे महत्त्व सांगणारी ही पोस्ट महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक वातावरणात एक महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणत आहे.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


