नगर तालुका | ४ जानेवारी | दिपक शिरसाठ
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण मानवतेला काळीमा फासणारे असून आरोपींनी देशमुख यांची केवळ हत्याच केली नाही तर त्यांच्या मृतदेहाची विटंबना करून त्याचे फोटो व व्हिडिओ प्रसारित करून दहशत माजवण्याचा प्रकार केला. मुख्य आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी जनभवना आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलीन झाली असल्याची टीका पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी केली. तसेच या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची मागणी देखील केली.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निंबळक आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आज जनआक्रोश आंदोलन करण्यात आले, आयोजित शोकसभेत ते बोलत होते. या आंदोलनात गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रामदास कोतकर, संदीप गेरंगे, उद्योजक अजय लामखडे यांची आदरांजलीपर भाषणे झाली. उपस्थितांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला.
शोकसभेसाठी बी. डी. कोतकर, मच्छिंद्रनाथ म्हस्के, दत्तात्रय दिवटे, ॲड. राहुल ठाणगे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शोकसभेचे निवेदन महादेव गवळी यांनी केले.
कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची ग्रामस्थांची मागणी
संतोष देशमुख यांच्या हत्यामागे असणारे मुख्य सूत्रधार तसेच आरोपींचे पाठीराखे राजकीय नेते यांसह ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावणीत कसूर केला आहे त्यांना सहआरोपी करण्यात यावे, त्यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. आरोपींना तातडीने कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने आबासाहेब सोनवणे यांनी केली.